Ad will apear here
Next
जिवाजी महाले
स्वराज्याची धुरा ज्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन वेळप्रसंगी मृत्यूलाही जे सामोरे गेले, अशा अनेक मावळ्यांच्या कर्तृत्वातून शिवरायांनी भूमिपुत्रांचे स्वराज्य उभे केले. त्यापैकीच एक वीर योद्धा म्हणजे शूरवीर जिवाजी महाले होय. नऊ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन.
.....
जिवाजी महाले यांच्या निष्ठेमुळेच शिवरायांनी अफजलखानासारखा गिधाड व कृष्णाजी भास्करसारखा देशद्रोही सहज संपवला. तसेच जिवाजींनी सय्यद बंडासारखा अफजलखानाचा अत्यंत चपळ अंगरक्षक संपवून शिवरायांचे प्राण वाचवले व स्वराज्याची २१ वर्षांची घौडदौड संरक्षित केली. त्यांच्यामुळे शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य वाढीस लागत राहिले. 

प्रतापगडाच्या रणसंग्रामप्रसंगी शिवछत्रपतींनी अफजलखानाची आतडी ओढून बाहेर काढली. त्याचा आरडाओरडा ऐकून हाती पट्टा चढवून शिवछत्रपतींवर वार करण्याकरिता भेटीच्या शामियान्यात धावून आलेल्या सय्यद बंडाचा हात त्याच्या पट्ट्यासकट अस्मानी उडविणारा जिवा महाला हा मूळचा महाबळेश्वरजवळच्या कोंडवली या गावचा रहिवासी होता. तो जातीने न्हावी असून, कान्होजी जेधे यांचा प्रतिपाळ करणाऱ्या इतिहासप्रसिद्ध देव महाला यांचा मुलगा होता.

शिवरायांनी आपल्या अनेक छोट्या-छोट्या मावळ्यांच्या मदतीने प्रचंड मोठे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य निर्माण करताना, अनेक मौल्यवान हिरे लयाला गेले. त्यांच्या या कार्यात तन-मन-धनाने या सर्वांनी सहकार्य केले. यात सर्वांत महत्त्वाची भूमिका शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची होती.

प्रतापगडाच्या पायथ्याशी सातारा जिल्ह्यात कोंडवली गावातील सकपाळ कुटुंबात वीर जिवाजींचा जन्म नऊ ऑक्टोबर १६३५ रोजी झाला. आई-वडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाले या आप्ताने केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले. बालपणापासून त्या काळी आलेल्या धकाधकीच्या संकटातून लढायांच्या काळात मुलांना लढाईचे प्रशिक्षण दिले जायचे. जिवाजीसुद्धा साताऱ्याच्या तालमीतला लाल मातीत मेहनत करणारा पठ्ठा होऊ लागला. जोर, बैठका, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे याचे शिक्षण त्याला मिळाले होते. मातीत कुस्त्या खेळणे या प्रशिक्षणात तो चांगला पारंगत झाला. जिवाजी दांडपट्टा तर असा फिरवायचा, की पायाच्या टाचेखाली ठेवलेल्या लिंबाचे तो डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच दोन तुकडे करायचा. उंच उड्या मारण्यात तो निष्णात होता. उड्डाण मारल्यावर हवेतच शत्रूच्या शरीराचे दोन तुकडे करत असे. शिवाय त्याची नजर अतिशय तीक्ष्ण होती.

शिवरायांना जेव्हा जिवाजी महालेविषयी समजले, तेव्हा त्यांनी जिवाजीला खास सैन्यात दाखल करून घेतले. तरणाबांड-भरदार मान-जाड पल्लेदार मिशा, सरळ नाक, भलेमोठे कपाळ आणि भेदक नजर... असे त्याचे रूप पाहताच शत्रूलाही कापरे भरत होते. वाघ-सिंह ज्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी धावतात त्याप्रमाणे तो अतिशय चपळ होता.

शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी विजापूरच्या दरबारात बड्या बेगमने सर्व मातब्बर सेनापती, सरदारांना बोलावले होते. तिने सर्वांना सवाल केला, ‘शिवाजीला कोण पकडून आणेल?’ दरबारात तर शांतता पसरली. तेवढ्यात मागून प्रचंड देहाचा, पायातील वहाणा कर्रकर्र वाजवत एक सरदार दरबारात आला. त्याने बड्या बेगमचे आव्हान स्वीकारले. अफजलखान निश्चितच हे काम फत्ते करणार असा विश्वास तिला वाटू लागला. भल्याबुऱ्या मार्गाने किंवा विश्वासघाताने अनेक शत्रूंना संपवण्यात तो तरबेज होता.

अफजलखान आपल्यासोबत हजारो सैनिक, घोडदळ-पायदळ घेऊन मजल-दरमजल करत महाराष्ट्रा त दाखल झाला. तेव्हा शिवराय रायगडावर होते. रायगड सोडून शिवरायांनी प्रतापगडावर जाण्याचा विचार केला. कारण प्रतापगड सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय योग्य किल्ला होता. शिवाय डोंगरी किल्ला असल्याने एका वेळी एकच व्यक्ती तेथे जाऊ शकत होती. आजूबाजूचा परिसर संपूर्ण जंगलाने वेढलेला, त्यात हिंस्र पशू-प्राणी, जंगली श्वापदांचा वावर असल्याने प्रतापगडावर जाणे खूपच अवघड होते. शिवराय प्रतापगडावर पोहोचल्याचे वृत्त समजताच अफजलखान खूप चिडला. त्याने हिंदू देवदेवतांची देवळे पाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरी शिवाजीराजे खाली येतील असा त्याचा कयास होता. शिवरायांना ही नीती माहिती होती. ते पाहून त्याने सेवकामार्फत शिवाजीराजांना भेटण्याचा निरोप पाठवला, ‘तुम्ही माझ्या मुलांसारखे; मला भेटण्यास या, आमचे किल्ले परत द्या, मी तुम्हाला आदिलशहाकडून जहागिरी देतो.’ शिवरायांनी टोला मारला, ‘मला तुम्हाला भेटायची भीती वाटते. तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी या.’ 

हे ऐकताच अफजलखान खुश झाला. भेटीची तारीख आणि वेळ ठरली. महाराजांनी सगळ्यांना कामे वाटून दिली. ‘जिवा, तू सय्यद बंडावर नजर ठेवायची,’ असे सांगून त्यांना सोबत घेतले. भेटीचा दिवस उजाडला. प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर शामियाना उभारण्यात आला होता. अफजलखानाचे मनोराज्य चालू होते. महाराज गडाच्या पायऱ्या उतरत असताना, थोड्या अंतरावर सय्यद बंडा उभा होता. जिवाजींनी सय्यद बंडाविषयीची माहिती महाराजांना दिली. त्याला तेथून दूर करण्यास सांगितले. महाराजांनी वकिलामार्फत निरोप पाठवून सय्यद बंडास दूर करण्यास सागितले. अफजलखान व त्याचा वकील कृष्णाजी भास्कर शामियान्यात होते. 

अफजलखानाने शिवरायांना दोन्ही हात हवेत पसरून आलिंगन दिले. मृत्यूचा जबडाच तो. त्या जबड्याने एकदम महाराजांना मिठी मारली. महाराज खुजे होते. त्यांचे डोके खानाच्या छातीला लागले. आणि खानाने एकदम महाराजांची मान आपल्या डाव्या काखेत पकडली व डाव्या कुशीत दाबून ठेवली आणि उजव्या हाताने कट्यारीने पाठीवर वार केला. शिवरायांच्या अंगात चिलखत असल्याने कट्यार घसरत गेली.

अंगरखा टराटरा फाटत होता. शिवरायांनी क्षणाचाही विलंब न लावता अस्तनीत लपवलेला बिचवा काढून खानाच्या पोटात खुपसला. शिवरायांवर त्याच्या वकिलाने हल्ला चढवला. इकडे सय्यद बंडा गोंधळाचा आवाज ऐकून धावत आला. महाराजांवर हल्ला करणार इतक्यात जिवा महालेने सय्यद बंडाचा समशेर असलेला हात वरच्यावर हवेत कापला. ‘महाराज! याला मीच ठार करतो! येऊ द्या त्याला!’ 

सय्यदाचा वार जिवाने आपल्या अंगावर घेत अडविला आणि सपकन घाव घालून सय्यद बंडाच्या चिरफाळ्या केल्या! शिवरायांनाही या चपळाईचे कौतुक वाटले. तेव्हापासूनच ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ हा वाक्प्रचार रूढ झाला. सुरतेच्या स्वारीतही जिवाजींनी महाराजांना वाचवल्याची नोंद आहे.

प्रतापगडाच्या रणसंग्रामाप्रसंगी जिवा महालाने जी मर्दुमकी गाजविली त्याबद्दल शिवछत्रपतींनी त्याची सर्फराजी करून त्यास गुंजन मावळातील साखर हे गाव इनाम दिले.

अशा या श्री शिवछत्रपतींचे रक्षक जिवा महाले यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर, पुणे
(इतिहास अभ्यासक)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CWQDCR
Similar Posts
शिवपत्नी महाराणी सईबाई पाच सप्टेंबर १६५९ रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निजधामाला गेल्या. आज त्यांचा स्मृतिदिन.
सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडिक स्वराज्य उभारण्याच्या कामी ज्या असंख्य वीरांनी पराक्रम गाजविला, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडिक. २९ सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याबद्दल ही माहिती...
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे छत्रपती राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी राजसबाई यांच्या पोटी जन्माला आलेले संभाजीराजे हे कोल्हापूर राज्याचे दुसरे छत्रपती. २० डिसेंबर हा त्यांच्या स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याविषयी...
स्त्री-शिक्षणासाठी झटलेल्या श्रीमंत इंदुमती राणीसाहेब राजर्षी शाहू महाराजांच्या स्नुषा श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांनी स्त्री-शिक्षणविषयक, तसेच अन्य सामाजिक कार्यातून राजर्षी शाहू महाराजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. ३० नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language